मुंबई : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव सोमवार, १६ मार्च रोजी चर्चेला येणार आहे. राष्ट्रवादीच्या ठरावाला भाजपाने पाठिंबा देण्याचे निश्चित केले असल्याने या दोन पक्षांच्या चुंबाचुंबीने अगोदरच नाराज असलेल्या शिवसेनेने सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या बाजूने मतदान करण्याची तयारी दर्शविली आहे. या अविश्वास ठरावावरून रंगलेल्या राजकारणामुळे विरोधकांची एकजूट जशी भंगणार आहे, तशी सत्ताधारी भाजपा व शिवसेनेतील कलगीतुऱ्यात भर पडणार आहे.सभापती देशमुख यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्याकरिता ४० मतांची गरज असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडे २८ मते आहेत. शेकापच्या जयंत पाटील यांनी ठरावाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठराव मंजूर करवून घेण्याकरिता राष्ट्रवादीला भाजपाच्या १२ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. भाजपाने पाठिंबा देऊ केला आहे.भाजपाने राष्ट्रवादीच्या ठरावाला पाठिंबा दिल्याने शिवसेना नाराज झाली आहे. देशमुख यांना पदावरून दूर करण्याकरिता त्यांनी कोणता गुन्हा केला आहे, असा सवाल शिवसेनेने भाजपाला केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अविश्वास ठरावाच्या विरोधात काँग्रेसच्या २१ सदस्यांबरोबर शिवसेनेचे ७ सदस्य मते टाकतील, असे संकेत शिवसेना वर्तुळातून मिळत आहेत.केंद्रात व राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मातोश्री’वर गेले नाहीत. मात्र मोदी हे बारामती येथे शरद पवार यांच्या निमंत्रणावरून गेले. ही बाब शिवसेनेला रुचलेली नाही. (विशेष प्रतिनिधी)
वकिलांची राज्यस्तरीय परिषद उद्यापासून
By admin | Updated: March 13, 2015 02:44 IST