तासगाव (जि़सांगली) : भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना आणीबाणीच्या वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. तुरुंगामध्येही बराच काळ गेला होता. आता आणीबाणीसदृश परिस्थिती आहे काय? याची शंका त्यांच्या मनात आहे. त्यांची शंका सरकारने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी पत्रपरिषदेत मांडले. पवार म्हणाले, पीक कर्जाची पुनर्रचना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला; मात्र ५० टक्केशेतकऱ्यांनाही अद्याप कर्ज वाटप झाले नाही. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. तसेच शासनाने साखर उद्योगासाठी जाहीर केलेल्या सहा हजार कोटींच्या पॅकेजचा लाभ महाराष्ट्रातील साखर उद्योगाला होईल, असे वाटत नसल्याचे ते म्हणाले़ . साखर उद्योगाला मदत करण्याच्याबाबतीत पूर्वीच्या आणि आताच्या सरकारच्या धोरणांमध्ये मोठा फरक आहे. आघाडी सरकारच्या काळात साखर उद्योगाला पाच वर्षांच्या कालावधीसाठी बिनव्याजी मदत करण्यात आली होती. त्यावेळी केंद्र सरकारने १० टक्केदराने व्याज भरण्याचा निर्णय घेतला होता. आताच्या सरकारने सहा हजार कोटींची बिनव्याजी मदत करण्याचे धोरण ठरवले आहे. मात्र त्यासाठी केवळ एक वर्षाची मुदत दिली आहे. कर्ज मिळण्यासाठी आठ महिने लागतील. नंतर शेतकऱ्यांना पैसे मिळतील. त्यामुळे फायदा होणार नाही. चार महिन्यांसाठी केंद्र सरकार एक वर्षाचे व्याज भरणार आहे, पण मदत देण्याच्या धोरणामुळे त्याचा लाभ महाराष्ट्रातील साखर उद्योगाला होणार नसल्याचे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अडवाणींची शंका गांभीर्याने घ्यावी!
By admin | Updated: June 22, 2015 02:35 IST