जेजुरी : चौदाव्या वित्त आयोगांतर्गत ‘आमचा गाव-आमचा विकास’ या कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती स्तरावर प्रत्येक गणनिहाय कार्यशाळांच्या नियोजनाबाबत प्रशासनाच उदासीन असल्याचे वाळुंज येथील कार्यशाळेच्या निमित्ताने निदर्शनास आले. यशदा पुणे आणि पुणे जिल्हा परिषदेच्या संकल्पनेतून व पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात ‘आमचा गाव-आमचा विकास’ गणस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीचा विनिमय करणे, गावचा विकास आराखडा तयार करणे आदीबाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचे नियोजन आहे. अत्यंत महत्त्वाच्या या कार्यशाळेतून सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, सर्व अंगणवाडी कार्यकर्ते व पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी, कृषी सहायक, तलाठी, सहकारी संस्थांचे सचिव, वायरमन, गावपातळीवर कार्यरत असणाऱ्या, बँकांचे व्यवस्थापक, स्वयंसेवी संस्था, बचत गटांचे अध्यक्ष आदींसह एक दिवसाची कार्यशाळा घेण्याच्या सूचना आहेत. यापैकी कोणीही गैरहजार राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. बेलसर गणाचे सदस्य दत्ता झुरंगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘आजच्या कार्यशाळेची अत्यल्प उपस्थिती पाहून ही कार्यशाळा पुन्हा घेणार आहोत, तसे तेथेच जाहीर केले असल्याचे सांगितले. २६ गावे : महसूलसह सहकारही निरुत्साही आज सकाळी ११ वाजता पुरंदर तालुक्यातील वाळुंज येथे बेलसर व माळशीरस गणाचीही कार्यशाळा घेण्यात आली होती कार्यशाळेला मार्गदर्शन आदर्श गावांचे सरपंच व तज्ज्ञ संभाजी काळाने, अंकुश परखंडे, कैलास धिवार हे उपस्थित होते. मान्यवरामध्ये माजी जि. प.सदस्य सुदाम इंगळे, पंचायत समिती बेलसर गणाचे सदस्य दत्ता झुरंगे उपस्थित होते. मात्र, या कार्यशाळेचे आयोजन ज्यांच्यासाठी करण्यात आले होते, त्यापैकी अनेकजण उपस्थित नव्हते. अत्यंत अल्प उपस्थिती पाहून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम इंगळे संतप्त झाले. त्यांनी उपस्थितांची हजेरीच घेतली. यात बेलसर व माळशिरस गणातील २६ गावांतील एकही तलाठी, पशुधन पर्यवेक्षक, बचत गट अध्यक्ष, सहकारी संस्थांचे सचिव, बँकाचे व्यवस्थापक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आदींपैकी कोणीही उपस्थित नव्हते, उपस्थितांत केवळ चार महिला सरपंच, दोन उपसरपंच, चार कृषी सहायक, फक्त सहाच ग्रामपंचायत सदस्य, ३ आरोग्य सेविका, एवढीच उपस्थिती पाहून मान्यवरांनी कार्यशाळेचे नियोजन करणाऱ्या पंचायत समिती ग्रामपंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडतीच घेतली.
‘आमचा गाव...’साठी प्रशासनच उदासीन
By admin | Updated: June 30, 2016 01:43 IST