अतिरेकी मग तो हिंदू, मुस्लीम, शीख असो की ख्रिश्चन त्याला फासावर लटकविले जावे. सरकारने निवडक लोकांनाच शिक्षा ठोठावण्याचे धोरण अवलंबू नये. समझोता, मालेगाव स्फोटातील हल्लेखोरांवर कारवाई करून दाखवा, या शब्दांत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सरकारला आव्हान दिले. सरकारने काही प्रकरणी अतिघाई तर काही प्रकरणी संथपणा अवलंबला आहे, असे ते संविधान चर्चेच्या वेळी उपस्थित झालेल्या दहशतवादाच्या मुद्द्यावर म्हणाले. संसदेवर हल्ला करणाऱ्यांना फासावर लटकविले जावे याला सभागृहातील कुणाचाही विरोध नव्हता. हल्ला करणारे कुणी उरले असतील तर त्यांनाही फासावर चढवावे असे मी म्हणेन. मी जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री असताना दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई केली. सीमेपलीकडून कुणी बंदूक घेऊन येत असेल तर त्याचा मृतदेहच परत पाठवला जावा असे माझे म्हणणे होते, असे आझाद यांनी म्हणताच दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बाक वाजवून त्यांचे अभिनंदन केले. इतरांनीही त्यांना जोरदार साथ दिली. त्यावर आझाद लगेच म्हणाले की, समझोता एक्स्प्रेस, मालेगाव आणि हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांवर कारवाई केली तर मीसुद्धा सरकारचे अभिनंदन करेन.
समझोता, मालेगाव स्फोटातील हल्लेखोरांवर कारवाई करा - आझाद
By admin | Updated: November 28, 2015 02:10 IST