मुंबई : मुंबईत गॅसपुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल)च्या मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील समभागांमुळे राज्य सरकारला तब्बल ५२० कोटींचा नफा झाल्याची माहिती उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मुंबईत गॅसपुरवठा करणाऱ्या एमजीएलच्या समभागांच्या खरेदीसाठी डिसेंबर २०१४मध्ये राज्य सरकारने १० कोटी रुपये मोजले होते. एमजीएलमध्ये राज्य सरकारचा १० टक्के इतका वाटा असून, गेल, बीजीएल, राज्य सरकार आणि खासगी समभागधारकांकडे उर्वरित वाटा आहे. २०१४ साली राज्य सरकारने १० रुपये प्रति समभाग या दराने १० कोटींचे समभाग विकत घेतले. आज या समभागांची किंमत ५३० रुपये प्रति समभाग इतकी झाली आहे. म्हणजेच १० कोटींची किंमत आज ५३० कोटी रुपये इतकी झाली आहे. कंपनीमार्फत ४ लाख २० हजार वाहनांना सीएनजी पुरविण्यात येतो. त्यातील १ लाख ९६ हजार रिक्षा आहेत. नागरिकांना सोयीसुविधा मिळण्यासोबतच प्रदूषणही कमी होण्यास मदत होते आहे. नवी मुंबईतही सीएनजीचे तीन नवीन पंप सुरू करण्यात येणार असून, रायगडमध्येही कंपनीचा लवकरच विस्तार करण्यात येणार असल्याचेही अपूर्व चंद्रा यांनी सांगितले.दक्षिण मुंबई, धारावी आणि मुंबईतील काही भागांत अरुंद रस्त्यांमुळे पाइपलाइन टाकणे शक्य नसल्याचे चंद्रा यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
एमजीएलच्या समभागातून ५२० कोटींचा फायदा
By admin | Updated: July 2, 2016 04:35 IST