मुंबई : मराठवाडा कायमस्वरुपी पाणीटंचाईमुक्तसाठी १५ हजार कोटी रुपयांची मराठवाडा वॉटरग्रीड योजना तयार केली असून तिचे सादरीकरण पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बुधवारी मंत्रालयात करण्यात आले. ही योजना प्रभाावीपणे आणि कालबद्ध पद्धतीने राबविण्यात येईल, असे लोणीकर यांनी सांगितले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोषकुमार आदी उपस्थित होते. या योजनेंतर्गत मराठवाड्यातील तसेच परिसरातील मोठ्या जलाशयांमधून मराठवाड्यातील गावे आणि शहरांना पिण्याच्या पाण्याचा शाश्वत पुरवठा करण्यात येणार आहे. गुजरात, तेलंगण व होगेनकाल (तामिळनाडू) येथील ग्रीड पाणीपद्धत प्रकल्पाचा अभ्यास करण्यात आला असून, त्याच धर्तीवर हा प्रकल्प अंमलात येणार आहे. आराखडा, अंदाजपत्रक आदी बाबींची पूर्तता करून संपूर्ण मराठवाड्याला टंचाईमुक्त करणारी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
पाणीटंचाईमुक्तीसाठी १५ हजार कोटींची योजना
By admin | Updated: September 29, 2016 01:00 IST