शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील शेंद उतर येथे मियावाकी पद्धतीने जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर ५०० रोपांची लागवड करण्यात आली असून, या रोपांचे संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे हरित ग्राम म्हणून गावाची ओळख निर्माण होणार आहे.
तालुक्यातील शेंद उतर हे पुनर्वसित गाव असून, गावात मोठे रस्ते आहेत. येथील जिल्हा परिषद शाळेला जवळपास अर्ध्या एकरपेक्षा अधिक मैदान आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली परबत माने यांनी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर वृक्ष लागवड करण्याचा ठराव मंजूर केला. शनिवारी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांच्या हस्ते मियावाकी पद्धतीने ५०० रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष गोविंद शेळके, ग्रामसेवक अनिल जाधव, परबत माने, बाबासाहेब माने, विनायक बिराजदार, दगडू सुरवसे, अनिल माने, लिंबराज भालके, पद्माकर माने, गणेश माने, बबर आवटे, शाळेचे मुख्याध्यापक सिद्राम चौसष्टे यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
फळझाडांची लागवड...
जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर चिंच, आंबा, जांभूळ, आवळा, पेरु, चिकू, सीताफळ आदी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. त्याचे संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.