उदगीर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील देवर्जन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकामार्फत सुरू असलेल्या कामांची पाहणी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी करून पथकाच्या टीमचे कौतुक केले. या आरोग्य केंद्रातील चिघळी गावाने कोरोनाला वेशीवरच रोखले आहे.
तालुक्यातील देवर्जन आरोग्य केंद्रांतर्गत २५ गावे असून तिथे आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देवर्जन, शंभू उमरगा, दावणगाव, बामणी, मोघा व तोगरी येथे उपकेंद्र आहेत. आरोग्य केंद्रांतर्गत २५ गावातील ४२ हजार २२५ नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण गोरे व डॉ. नेहा मोदाणी व त्यांचे सर्व आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत आहेत. रुग्णांच्या चाचण्या करून त्यांना औषधोपचार देत आहेत.
उदगीर शहरालगतच्या निडेबनमध्ये २५३, मादलापुरात ८६ बाधित आढळून आले. देवर्जन ३२, मोघा २२, रावणगाव २८, आरसनाळ २५, येणकी २८, शंभू उमरगा १८, महादेववाडी १४, करवंदी १२ व अन्य काही गावांतून किरकोळ रुग्ण आढळून आले.
५९० बाधित, १४ जणांचा मृत्यू...
देवर्जन प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गतच्या २५ गावांतील ४२ हजार २२५ नागरिकांपैकी ५९० जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील १४ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक मृत्यू निडेबन येथील १० असून, तोगरी, मोघा, शंभू उमरगा व गंगापूर येथील एका रुग्णाचा त्यात समावेश असल्याची माहिती डॉ. किरण गोरे यांनी दिली. होम आयसोलेशन व विविध कोविड सेंटरमध्ये २८९ रुग्ण उपचार घेत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतच्या २५ गावांपैकी चिघळी गावाने कोरोनाला रोखले असल्याचे डॉ. किरण गोरे म्हणाल्या.
लसीकरणावर भर...
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतच्या सहा उपकेंद्रांअंतर्गत ३ हजार ६०८ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणासंदर्भात जनजागृती करण्यात आल्याने नागरिक स्वतः होऊन आरोग्य केंद्राकडे येत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीनाही आवश्यक त्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी या आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण गोरे यांनी उपाययोजनांची माहिती दिली. राज्यमंत्री बनसोडे यांनी देवर्जन आरोग्य केंद्राच्या सर्व टीमचे कौतुक केले.
लक्षणे दिसताच तपासणी करावी...
सध्या कोरोना वाढत आहे. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसून येताच जवळच्या आरोग्य केंद्रामार्फत तपासणी करून घ्यावी. नागरिकांनी घाबरून जावू नये. शासनामार्फत सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे राज्यमंत्री बनसोडे म्हणाले.