औराद शहाजानी (जि. लातूर) : सततच्या अति पावसामुळे टोमॅटोला फटका बसला आहे. त्यातच बाजारपेठेत २ ते ४ रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. त्यामुळे तोडणीचाही खर्च निघत नसल्याने निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातील काही शेतकरी टोमॅटो जनावरांच्या दावणीला पशुखाद्य म्हणून टाकत आहेत.
जिल्ह्यातील औराद शहाजानीसह वडवळ नागनाथसह जवळपास ५० गावांतील शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या टोमॅटोची दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरूर, हैदराबादसह उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थानमधील व्यापारी या भागात येऊन शेतावर खरेदी करतात. यंदा राज्यात टोमॅटोचे क्षेत्र वाढले आहे. दरम्यान, गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे टोमॅटोस फटका बसला. तसेच बाजारपेठेत मागणीही कमी असतानाही टोमॅटोला २ ते ४ रुपये प्रति किलो दर मिळत आहे. त्यातून ताेडणीचा खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक हतबल झाले आहेत. काही शेतकरी नाइलाजास्तव जनावरांना चारा म्हणून टोमॅटो टाकत आहेत.
तोडणीचा खर्चही निघेना...
मी दोन एकरवर टोमॅटोची लागवड केली आहे. सध्या टोमॅटो ताेडणीला आले असताना बाजारपेठेत मागणी नाही. अतिपावसामुळे बाहेरील व्यापारी खरेदीसाठी तयार नाहीत. जिल्ह्यातील किरकोळ बाजारात २ रुपये प्रति किलो दर मिळत आहे. त्यातून तोडणीचा खर्चही निघेनासा झाला आहे. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.
- भागवत बिरादार, शेतकरी, तगरखेडा.
सोबत फोटो...
११ एलएचपी औराद शहाजानी १ : टोमॅटोचे भाव कोसळल्याने निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील शेतकरी भागवत बिरादार यांनी जनावरांच्या दावणीला चारा म्हणून टोमॅटो टाकले आहे.