उदगीर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा यावर्षी शासनाने टप्या-टप्याने सुरू करण्याचे आदेश दिल्याने जुलै महिन्यात इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या, तर मागील आठवड्यात इयत्ता ५ वी ते ७ वीच्या शाळाही सुरू करण्यात आल्याने शहरी भाग वगळता तालुक्यातील २०० शाळा नियमित चालू झाल्या असून, विद्यार्थ्यांची उपस्थितीही दिलासादायक असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी नितीन लोहकरे यांनी दिली.
उदगीर तालुक्यात शहरी भाग वगळता ग्रामीण भागात खासगी व जिल्हा परिषदेच्या एकूण २२३ शाळा आहेत. यात जिल्हा परिषदेच्या १४५ तर खासगी ७८ शाळा आहेत. या सर्व शाळांतील एकूण पटसंख्या २५ हजार ४४६ आहे. सद्यस्थितीत २३ शाळा निवासी व आश्रम शाळा असल्यामुळे त्या चालू करण्यात आलेल्या नाहीत. तालुक्यातील हाळी व तोंडचिर येथे कोरोनाचा संसर्ग असल्याने तेथील शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. तर आजघडीला तालुक्यातील २०० शाळांतून ७५ टक्के पेक्षा जास्त विद्यार्थांची उपस्थिती असून, विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित असून, शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या आहेत. तालुक्यातील सुरू असलेल्या ग्रामीण भागातील शाळांतून आजपर्यंत एकही विद्यार्थी कोरोना संसर्गाने बाधित झाला नाही; मात्र खबरदारी घेणे आवश्यक आहे. तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची बैठक घेऊन १८ वर्षांपुढील विद्यार्थांना लसीकरण करून घेण्याची सूचना देण्यात आली आहे. तर तालुक्यातील जवळपास ९९ टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी सांगितले.
धोका टळलेला नाही, काळजी घ्या...
कोरोना संसर्गाचा धोका टळलेला नाही. आजपर्यंत एक ही विद्यार्थी कोरोना संसर्गाने बाधित झाला नाही, ही दिलासादायक बाब आहे. यापुढे जागरूक व सतर्क राहून अध्यापन करणे आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायझर व तापमान तपासणी नियमित करून घ्यावी. ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आढळून आल्यास तत्कळ प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपकेंद्रात विद्यार्थांना पाठवून न घाबरता तपासणी करून घ्यावी. नितीन लोहकरे - गटशिक्षणाधिकारी
ऑफलाइनमुळे विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण...
जवळपास दीड वर्षापासून पाल्य घरीच बसून ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेत होते. यावर्षी नियमित शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी आनंदात आहेत. नियमित शिक्षणाचे धडे घेत शाळेत खेळणे, बागडणे व धम्माल मस्ती यामुळे विद्यार्थी ताण-तणावातून मुक्त झाले आहेत. कोविडच्या नियमांचे पालन करीत शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. - सुनील जाधव, पालक.