जिल्ह्यातील शेतकरी मूग, उडिद, तूर, ज्वारी याबरोबरच सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करतात. मात्र, गतवर्षी सोयाबीनला ५ हजार रुपयांचा दर मिळाला. मागील तीन महिन्यांपूर्वी तर १० हजार रुपये दर मिळाला. त्यामुळे अनेकांनी सोयाबीन लागवडीवर भर दिला. जिल्ह्यात ४ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आहे. ऑगस्ट महिन्यात बहुतांश भागात पावसाने दडी मारल्याने पिके संकटात आली होती. पैसा, गोगलगाईने हल्ला चढविला होता. कृषी विभागाने जनजागृती केल्यानंतर शेतकऱ्यांनी उपाययोजना राबविल्या. त्यामुळे पिके तरली. पिके शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना आता चक्री भुंगा, उंट अळी, मिली बग, लष्करी अळी किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यातच काही मंडलात अतिवृष्टी झाल्याने पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने फवारणी करणे शेतकऱ्यांना जिकीरीचे ठरत आहे.
सोयाबीनचा पेरा हेक्टरमध्ये
२०१७ ३००० ३,१०,०००
२०१८ ३५०० ३,४०,५००
२०१९ ४००० ३,९५,०००
२०२० ५००० ते १०००० ४,१७,०००
२०२१ ४, २७,०००
काय आहे मिली बग?
ढेकणाप्रमाणे दिसणारी मिली बग कीड ही द्राक्षे, मूग, उडीद, तूर, सोयाबीन व इतर पिकांवर आढळून येते. ही कीड रस शोषून घेणारी आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. लातूर जिल्ह्यात सद्य:स्थितीत मिली बगचा प्रादुर्भाव नसल्याचे चित्र आहे.
पाऊस, रोगराईमुळे उत्पादनात हाेणार घट...
खरिपाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी केली. मात्र, मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने पिके कोमेजू लागली होती. आता पावसाने हजेरी लावली असली तरी अनेकांच्या पिकात पाणी साचले आहे. त्यामुळे उत्पादनात घट येणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
पेरणीवर केलेला पैसा निघतो का नाही?
खरिपाची पेरणी वेळेवर केली. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन करपून गेले. आता उरलेले सोयाबीन पावसामुळे जाण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे पेरणीवर केलेला पैसा निघतो की नाही, याची चिंता लागली आहे.
- विष्णू जाधव
सोयाबीन पीक जोमात होते. मात्र, पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. आता पिकांवर केलेला खर्चही निघतो की नाही याची चिंता लागली आहे. शासनाने मदत करावी.
- गजानन साळुंके
फवारणी आवश्यक...
सध्या सोयाबीनला शेंगा लागत आहेत. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी करणे गरजेचे झाले आहे. सद्य:स्थितीत लष्करी अळीचा काही भागांत प्रादुर्भाव दिसून येत आहे.