सन २०१२ ते २०१८ या कालावधीत जवळपास ५७ महिने प्रेरक म्हणून महिना दोन हजार रुपये या तुटपुंज्या मानधनावर काम केले आहे. तालुक्यातील १४४, तर लातूर जिल्ह्यातील १५७२ प्रेरकांचे वारंवार मागणी करूनही आजतागायत आणखी १९ महिन्यांचे मानधन शासनाकडे थकीत राहिले आहे. सन २०१८ पासून कार्यक्रम बंद असल्याने या प्रेरकांच्या हाताला काम नाही. प्रेरकांकडून प्रशासनाने काम करून घेतले. कार्यक्रम बंद झाल्यावर सर्व सोपस्कार पार पाडून घेतले. मात्र थकीत मानधनाविषयी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे बोट दाखवून स्वतः जबाबदारी टाळत आहेत. गत दीड वर्षापासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हातचा रोजगार गेला असून महागाईने कळस गाठला आहे. अशा परिस्थितीत जगणे कठीण बनले असून शासनाकडील थकीत मानधन तात्काळ देऊन बेरोजगार प्रेरकांच्या हाताला काम देण्याचीही मागणी प्रेरकांनी निवेदनात केली आहे.
निवेदनाच्या प्रती आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना दिल्या आहेत. निवेदनावर भुजंग अर्जुने, निशिकांत शिंदे, अफजलपाशा शेख, अंकुश दांडगे, गोविंद दीक्षित, दत्ता मुंडे, उध्दव दुवे, उषा शिंदे, शीतल मस्के, मंगेश तोडकरी, रेणुका तोडकर, दयानंद केंद्रे, दत्ता नरवाडे, नरेंद्र घुगे यांच्यासह ४४ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.