तीन आठवड्यांपासून पावसाने गुंगारा दिल्याने खरिपातील बहरलेली पिके वाळत होती. त्यामुळे शेतकरी धास्तावले होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी उस्मानाबादचे खा. ओमराजे निंबाळकर यांच्याकडे निम्न तेरणा प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी केली. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार १५ ऑगस्ट रोजी पाणी सोडण्यात आले आहे. त्याचा औसा, निलंगा, लोहारा व उमरगा तालुक्यांतील कालव्याशेजारील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील ३२ गावांना लाभ...
निम्न तेरणा प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने त्याचा निलंगा तालुक्यातील २०, औश्यातील १२, उमरग्यातील ८ आणि लोहाऱ्यातील ४ गावांतील शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे निम्न तेरणा पाटबंधारे प्रकल्पाचे शाखा अभियंता कृष्णा येनगे यांनी सांगितले.