लातूर : अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना ये-जा करता यावी म्हणून राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू ठेवली आहे. मात्र, ज्यांच्याकडे पास नाही, त्या व्यक्ती दवाखान्यात नातेवाईकाला भेटण्यासाठी, डबा देण्यासाठी जायचे असल्याची कारणे सांगून प्रवास करत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात पाच आगार आहेत. या आगारांमधून सध्या ३० ते ३५ गाड्या दररोज धावत आहेत. लातूर आगाराच्या १६ बसेस सुरू आहेत. ही सेवा अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच दिली जात आहे. त्यानुसार उदगीर, अहमदपूर, मुरुड, निलंगा, औसा, नांदेड, उस्मानाबाद या मार्गांवर महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या काही बसेस सुरू आहेत. साडेचारशे ते पाचशे प्रवासी या सेवेचा दिवसाला लाभ घेत असल्याचे आगार व्यवस्थापकांनी सांगितले.
वाहकांसोबत वादाच्या घटना
लातूर - उदगीर या मार्गावर जास्त प्रवासी आहेत. त्या खालोखाल अहमदपूर - लातूर या मार्गावर आणि त्यानंतर लातूर - निलंगा या मार्गावर प्रवासी अधिक आहेत. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळून काही व्यक्तीही प्रवासासाठी येतात. दवाखान्याची, शाळेच्या कामाची कारणे त्यांच्याकडून सांगितली जातात. यावेळी खात्री न पटल्यामुळे वाहकाने त्यांना गाडीत घेण्यास विरोध केला तर हे प्रवासी वाद घालतात. दरम्यान, अशा घटना या मार्गांवर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु, प्रवाशांची कारणे पटण्यासारखी असतील तरच प्रवासाला मुभा दिली जाते.
लातूर आगारातून १५ ते १६ बसेस सुरू आहेत. उदगीरला ८, अहमदपूरला ४, निलंग्याला ४, औसा २ अशा गाड्या धावतात. केवळ आणि केवळ अत्यावश्यक सेवेतीलच लोकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेला अडथळा होऊ नये, म्हणून ही सेवा सुरू आहे. उदगीर, अहमदपूर, नांदेड, उस्मानाबाद, निलंगा, औसा, मुरुड आदी मार्गांवर या बसेस धावत आहेत. कोविड नियमांचे पालन करून सेवा मर्यादित स्वरूपात सुरु आहे.
- जाफर कुरेशी, आगार व्यवस्थापक