शिरूर अनंतपाळ आणि चाकूर तालुक्यातील येरोळ, कबनसांगवी, नागेवाडी, सताळा, डिगोळ, सुमठाणा, आंबेवाडी, बावलगाव, चांबरगा, बोळेगाव येथील तरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतात युवा शेतकरी व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करून एकमेकाच्या संवादाने एकत्र येऊन शेतीमध्ये लाखो रुपये खर्च करून मल्चिंग पेपरवर मिरची लागवड केली. मिरचीही चांगलीच बहरली हाेती. मात्र, हिरव्या मिरचीला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या परिसरातील शेतकरी आपली मिरची नळेगाव, उदगीर आणि लातूर येथील भाजी मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जातात. लिलावामध्ये मिरचीला जेमतेम सहा ते दहा रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. महिला मजुराला तोडण्यासाठी किलोला पाच रुपये व मार्केटपर्यंत मालवाहतुकीसाठी एका पोत्याला ५० रुपये भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे मिरचीला एक्करी ५० हजार रुपये केलेला खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये विकतचे पाणी आणून जगविलेल्या मिरचीला भाव मिळत नसल्याने बाजारात कवडीमाेलाच्या भावात विक्री करावी लागत आहे. यातून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
खर्चाचा तालमेळ बसेना...
उदगीर शहरातील बाजारात मिरची उत्पादक शेतकऱ्यांकडून लिलावामध्ये सहा ते बारा रुपये किलोप्रमाणे शेतकऱ्यांकडून व्यापारी मिरचीची खरेदी करीत असल्याने मिरची तोडणीचा खर्च आणि मालवाहतुकीचे भाडे परवडत नसल्याने शेतातील मिरचीच्या फडावरच नांगर फिरवला असल्याचे कबनसांगवी येथील शेतकरी ओम वैजीनाथ सांगवे यांनी सांगितले.
लाखाे रुपयांचा फटका...
शिरूर अनंतपाळ आणि चाकूर तालुक्यातील गावात अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत प्रयाेगशील शेती करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. मात्र, बाजारात शेतीमाल, भाजीपाल्याला मिळणारा कवडीमाेल भाव हा शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारा ठरला आहे. सध्याला हिरव्या मिरचीला भावच नसल्याने शेतकऱ्यांची हिरवी मिरची जाग्यावरच पिकली आहे. यातून लाखाे रुपयांचा फटका सहन करण्याची वेळ आली आहे. लागवड खर्चही पदरी पडत नसल्याने माेठे नुकसान झाले आहे.