रेमडेसिविर इंजेक्शनचा अनावश्यक वापर टाळावा, तसेच दुसऱ्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना देत पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी. जिल्ह्यात शंभर दिवसांमध्ये लसीकरण मोहीम पूर्ण करण्याचे नियोजन सादर करावे. २५ पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या गावांमध्ये विलगीकरण उभारावे. शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडिट करावे. सर्व रुग्णालयांतील अग्निशमन यंत्रणा तपासून घ्यावी, ऑक्सिजन, औषधी व लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. उदगीर येथील रुग्णालयासाठी ऑक़्सिजनची वाढत असलेली मागणी आणि वाहतुकीदरम्यान येत असलेल्या अडचणी लक्षात घेता विलास सहकारी साखर कारखाना युनिट क्र. २ येथे तातडीने ऑक्सिजन प्लांट उभारणे शक्य आहे का, याची शक्यता तपासून पाहावी, अशी सूचना त्यांनी दिली.
लसीकरण केंद्राची पाहणी
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते विलासराव देशमुख शासकीय आयुर्विज्ञान संस्था, लातूर येथे करण्यात आला. जिल्ह्यातील एकही लाभार्थी कोविड-१९ च्या लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी. लातूर, उदगीर, निलंगा, ग्रामीण रुग्णालय औसा, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर या पाच ठिकाणी या वयोगटात लसीकरण सुरू झाले आहे, त्याचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.