उदगीर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते देगलूर रोडवरील अप्पाराव चौकापर्यंत महावितरणचे विद्युत पोल व डीपी रस्त्याच्या मधोमध मागील दोन वर्षापासून आहे त्या स्थितीतच आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणच्या वादात असलेले हे पोल आता महावितरणने बाजूला करण्याचे ठरवलेले असून, ठेकेदार या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.
उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते देगलूर रोड वरील गाव चौकापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. या रस्त्यावर काही ठिकाणी उच्च दाबाचे पोल व डीपी तसेच ठेवून रस्ता रुंदीकरण करण्यात आले. या काळात महावितरणने सार्वजनिक बांधकाम खात्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन गुन्हा नोंद करण्याबाबत पोलिसांना कळवले होते. परंतु पोलिसांनी दोन्ही विभागांना यावर तोडगा काढण्यात यावा म्हणून गुन्हा नोंद केलेला नव्हता. शहराचा विस्तार वाढत असल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. देगलूर, जळकोट, निजामाबाद तसेच तहसील कार्यालय औद्योगिक शिक्षण संस्था, देगलूर रोड येथे स्थलांतरीत झाल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. तसेच या रस्त्यावर अनेक रुग्णालय तसेच लाईफ केअर हॉस्पिटलला जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. नवीन सिमेंट रस्ता झाला. परंतु, चौकात विद्युत वितरण कंपनीचे पोल रस्त्याच्या मधोमध असल्याने रस्ता रुंदीकरण होऊनसुद्धा वाहनधारकांना स्वतःचा जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
विद्युत तारा खाली असल्याने अपघाताचा धोका...
रस्त्यावर काही ठिकाणी या पोल वरून विद्युत तारा खाली असल्याने धोका होण्याची शक्यता वाढलेली आहे. याबाबत प्रशासनाने वेळीच लक्ष घालून देगलूर रोड वरील किमान ५० पेक्षा जास्त विद्युत पोल तसेच उच्च विद्युत वाहिनीचे पोल व जमीनीलगत झालेल्या डीपी रस्त्याच्या कडेला करून नागरिकांना या भागातून वाहतूक करताना होणाऱ्या त्रासातून मुक्तता द्यावी, अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे.