अतिवृष्टी व अन्य अडचणींमुळे शेतकरी संपूर्णत: आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच पीकविमा कंपन्याही शेतकऱ्यांच्या विरोधात काम करीत आहेत की काय? हे सरकार पीकविमा कंपन्यांचे खिसे भरत असून शेतकऱ्यांचे खिसे मात्र रिकामे करीत असल्याचा आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी करून ते पुढे म्हणाले, हे सरकार पीकविमा कंपनीचे दलाली करणारे आहे. यासंदर्भात एकाही मंत्र्याने विधानसभेत अवाक्षरही काढले नाही. याचे मोठे आश्चर्य आम्हाला वाटते. पूर्वीच्या सरकारमध्ये शिवसेना होतीच. त्यावेळी शेतकऱ्यांनी एकही रुपया पीकविमा भरलेला नसताही ५० टक्के पीकविमा देण्याचे काम फडणवीस सरकारने केले होते, या गोष्टीचीही त्यांनी आठवण करून दिली. आता मात्र सत्ताधारी सरकारने हात वर केले आहेत.
दौऱ्याएवढाही पैसा शेतकऱ्यांना मिळाला नाही...
अतिवृष्टीमध्ये मंत्र्यांनी जेवढे दौरे केले आणि त्यावर जो पैसा खर्च झाला, तेवढेही पैसेही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, असा आरोप करीत माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये. ज्यांचे तोडले ते पूर्ववत करावेत. हे सरकार फसवे आहे, असा आराेपही त्यांनी केला.