लातूर : कोरोनाच्या संकटावर मात करून एस. टी. रुळावर येत असतानाच तिकीट मशीन बिघडल्याने वाहकांना आता पुन्हा हातात ट्रे घेऊन खटखट करावी लागत आहे. मशीन खरेदी व दुरुस्तीसाठी पैसे नसल्याने वाहकांना आता ट्रे शिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
लातूर जिल्ह्यात एकूण पाच आगार असून, या पाच आगारांमध्ये २४२ तिकीट मशीन आणि ३५२ ट्रे कार्यान्वित आहेत. एकूण ५९४ मशीन आणि ट्रे घेऊन वाहक काम करत आहेत. जिल्ह्यातील ५०५ बसेसपैकी ३२७ बसेस सध्या धावत आहेत. त्यांच्या १,६२१ फेऱ्या होत असून, दिवसाला ३० लाखांचे उत्पन्न एस. टी.ला मिळत आहे. जवळपास १५ लाखांचा तोटा कोरोनानंतर एस. टी. सहन करत आहे. त्यामुळे एस. टी.कडे मशीन खरेदी व दुरुस्तीला पैसे नसल्यामुळे वाहकांच्या हाती आता ट्रे तिकीट बॉक्स आला आहे.
दुष्काळात तेरावा
५०५ बसेसपैकी फक्त ३२७ बसेस सुरू आहेत. तब्बल १७८ बसेस अद्यापही बंद आहेत. त्यामुळे दिवसाला १५ लाखांचे उत्पन्न घटले आहे. लांबपल्ल्याची, रातराणी, जिल्हांतर्गत व परराज्यात सेवा सुरू असली, तरी पूर्ण क्षमतेने एस. टी. धावत नसल्याने तोटा सहन करावा लागत आहे.
आकड्यांची पुन्हा जुळवाजुळव
तिकीट मशीनवर वाहकांना हिशेब करणे सोपे जात होते. प्रवाशाला तिकीट देतानाही अडचण येत नव्हती. परंतु, आता मशीन नसल्यामुळे आकड्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे.
सध्या काही वाहकांचे मशीनवर तर काहींचे ट्रेवर काम सुरु आहे. ज्या कंपनीकडून मशीन घेतल्या होत्या, त्या कंपनीचा करार संपला आहे. त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. पुन्हा नव्याने मशीन सुरू होतील. - सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक