गणेशोत्सवास शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागत आहे. १० दिवस सुरू राहणाऱ्या गणेशोत्सवात यंदाही सामाजिक प्रबोधनाचा जागर सुरू राहणार आहे, तसेच सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय विविध गणेश मंडळांनी घेतला आहे.
गणेशोत्सवानिमित्त शहरातील बाजारपेठेत श्रींच्या मूर्ती दाखल झाल्या होत्या. शहरातील आझाद चौक, थोडगा रोडसह अन्य चौकातून गणेशमूर्ती खरेदीसाठी सकाळपासून आबालवृद्धांची रेलचेल सुरू होती. गणेशमूर्तीबरोबरच पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य खरेदी सुरू होती. त्यामुळे दिवसभर शहरातील बाजारपेठ फुलली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी विक्रेत्यांनी स्टॉल्स लावले होते.
बेल, फूल, केळीची पाने, केळीचे खांब, मक्याचे कणीस, जाणवे, श्रीफळ, दूर्वा, पान- सुपारी अशा पूजेच्या साहित्याची खरेदी सुरू होती, तसेच मोदक, लाडू, पेढ्यांनाही मागणी होती.
नागरिकांनी दुपारीपर्यंत गणेशमूर्तींची खरेदी करून घरोघरी स्थापना करण्यात आली. प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत भक्तिमय आणि आनंदी वातावरणात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, उपविभागीय पाेलीस अधिकारी बलराज लंजिले, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, पोउनि. रामचंद्र केदार, पोउनि. एकनाथ डक यांच्यासह ४० पोलीस कर्मचारी, एसआरपीची एक तुकडी आणि ४६ होमगार्डनी चोख बंदोबस्त ठेवला होता.