लातूर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी २ हजार ३६५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याला ९ हजार १४१ रुपयांचा कमाल, ७ हजार ८०० रुपये किमान, तर ९ हजार रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. दोन दिवसांपूर्वी सोयाबीनचा दर आठ हजारांवर होता, त्यामध्ये वाढ झाली असून, सोमवारी ९ हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाला असून, या हंगामातील हा सर्वाधिक दर आहे.
सोमवारी लातूर बाजार समितीत गूळ १३४ क्विंटल, गहू १,८०१, हायब्रीड ज्वारी २८, रब्बी ज्वारी ५४३, पिवळी ज्वारी ९, हरभरा २,१५२, तूर १,८४७, मूग ८८, उरंडी २३, तर ९७ क्विंटल करडईची आवक झाली. गुळाला ३,१९५, गहू १,९००, हायब्रीड ज्वारी ९००, रब्बी ज्वारी १,८००, पिवळी ज्वारी २,२००, हरभरा ४,७५०, तूर ६,१८०, मूग ५,८००, करडई ४,८५०, एरंडी ४ हजार ५५०, तर सोयाबीनला ९ हजार रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. सद्यस्थितीत खरीप हंगामातील पिके बहरली असून, कोळपणी तसेच फवारणीची कामे सुरू आहेत. शेतकरी शेतीकामात व्यस्त असल्याने बाजारात शेतमालाची आवक घटली आहे. सोमवारी हरभरा २,१५२, तर तुरीची १,८४७ क्विंटलची आवक झाली. सोयाबीनच्या दरात वाढ झाली असून, त्या तुलनेत आवकही मंदावली असल्याचे बाजारातील चित्र आहे.
साठा मर्यादेमध्ये वाढ; दर वधारले...
केंद्र सरकारने मूगवगळता इतर कडधान्यांवर स्टॉक लिमिट करण्याबाबतच्या अधिसूचनेत बदल केला आहे. त्यामुळे साठा मर्यादेमध्ये वाढ झाली असून, कडधान्याचे दर वधारले आहेत. त्यातच आवक नसल्याने दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने साठा मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.