जळकोट : तालुक्यात चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या शेकडो एकर जमिनीस फटका बसला आहे. पिकांबरोबर जमिनीची खरडण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. प्रशासनाने पाहणी करुन पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
जळकोट तालुक्यात यंदा मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे खरिपाची वेळेवर पेरणी झाली होती. दरम्यान, पिकांपुरता पाऊस झाल्याने पिकेही चांगली बहरली होती. गत महिन्यात जवळपास २५ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाने ताण दिला होता. त्यामुळे तालुक्यातील पिकांना काही प्रमाणात फटका बसला. अशातच रिमझिम पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या.
गत सोमवारी व मंगळवारी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. याशिवाय, नदीकाठच्या जमिनीची खरडण झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे दगड गोट्यांचा थर साचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिणामी, शेतकरी चिंतातुर झाला आहे. तालुक्यातील रावणकोळा येथील शहाजी चव्हाण, हनुमंत चव्हाण यांच्या चार एकर जमिनीतील उसाचे पीक पूर्णतः वाहून गेले आहे. पाण्यातील विद्युत मोटर वाहून गेली.
तसेच तालुक्यातील रावणकोळा, जळकोट येथील काही घरांची पडझड झाली आहे. नारायण नाईकवाडे यांचे घर पडले आहे. डिग्रसजवळील पूल वाहून गेल्याने जळकोट- नांदेड संपर्क तुटला होता. तालुक्यातील जवळपास २० ते २२ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला. डोंगरसांगवी, रावणकोळा, अतनूर, गुत्ती, मेवापूर, चिंचोली, होकर्णा येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील तिरु नदी दुथडी भरुन वाहत आहे.
तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, वीज बिल माफ करावे, सरसकट हेक्टरी ५० हजारांचे अनुदान द्यावे, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे, महेश धुळशेट्टे, संग्राम नामवाड आदींनी केली आहे.