यावेळी बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप राठी म्हणाले, बँक कार्यक्षेत्रातील छोटे व्यवसायिक, कारागीर, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी बँकेच्या वतीने माफक दरात कर्ज भांडवल रुपयाने दिले जाणार आहे. पगारदार नागरिकांना घर बांधकाम, फ्लॅट खरेदी, मुलांच्या उच्चशिक्षणासाठी, मुलांच्या लग्नासाठी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करत कर्जपुरवठा करण्यात बँक अग्रेसर राहील. सोलार प्रोजेक्ट, लघुउद्योजक, ॲग्रोबेस वेअर हाऊस बांधकाम, महिलांच्या सशक्तीकरणासाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य व्याजदराने भांडवल उभे करण्यास कर्ज पुरवठा केला जाईल. बँकेने मागील वर्षी मोठ्या उत्साहात रौप्यमहोत्सव साजरा केला. २५ वर्षांत बँकेच्या ठेवींमध्ये वाढ, कर्जपुरवठा, वसुली आदी बाबींवर प्रदीप राठी यांनी माहिती दिली. ३१ मार्च २०२० अखेर बँकेच्या एकूण ठेवी ४६४ कोटी २६ लाख, एकूण कर्जे ३१३ कोटी ४२ लाख असून बँकेस १४ कोटींचा नफा झालेला असून, टॅक्स, बिडीडीआर इतर तरतूद वजाजाता बँकेस निव्वळ नफा ४ कोटी झालेला असून, आजरोजी बँकेच्या ठेवी ५६५ कोटी, कर्जे ३६० कोटी रुपये आहे. बँकेची १ हजार कोटी व्यवसायाकडे वाटचाल असून, सभासदांची साथ आणि विश्वासावर शक्य असल्याचेही ते म्हणाले. विषयपत्रिकेचे वाचन बँकेचे सीईओ वाय. एस. मशायक, सहायक सरव्यवस्थापक सीए नरेश सूर्यवंशी, अधिकारी वैष्णवी पाटील यांनी केले. यावेळी सभासद उदय लातुरे, साकला यांनी बँकेच्या कामकाजावर विचार मांडले. श्रद्धा राठी यांनी आरबीआयचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या परिपत्रकावर माहिती दिली. आभार बँकेचे संचालक सीए सचिन भट्टड यांनी मानले. यशस्वितेसाठी सरव्यवस्थापिका किरण चित्ते यांनी परिश्रम घेतले.
लातूर अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST