अहमदपूर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत अनुदानावर बियाणे वाटप करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तालुक्यातून १ हजार ८७७ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. मात्र, यापैकी केवळ ५४३ शेतकऱ्यांची सोडतीमध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्यांना सोयाबीन आणि तुरीचे बियाणे वाटप होणार आहे. अर्ज करुनही सोडतीमध्ये उर्वरित शेतकऱ्यांची निवड न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
अहमदपूर तालुक्यातील ४० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार असून, त्यासाठी अनुदानावर केवळ ४५० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. तालुक्यात ७० हजार पेरणीयोग्य क्षेत्र असून, सर्वाधिक ४० हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी केली जाणार आहे. त्यासाठी २९ हजार ५०० क्विंटल बियाण्यांची गरज आहे. मात्र मागील काही वर्षापासून बियाणांचा प्रचंड तुटवडा असल्याने यंदा अनेक शेतकरी महाबीजच्या बियाण्यांवर अवलंबून होते. मात्र शासनाने यासाठी ऑनलाईन अर्ज भरून त्यासाठी लॉटरी पद्धतीने वाटप करण्याविषयी धोरण स्वीकारल्यामुळे अहमदपूर तालुक्यातील १ हजार ८७७ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. त्यातील ५४३ शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड झाली असून त्यांना ४५० क्विंटल बियाणे मिळणार आहे. सोयाबीन ३० किलोची बॅग २ हजार ४० रुपयाला असून त्यावर २६० रुपये अनुदान आहे. तुरीच्या दोन किलोच्या बॅगची किंमत २६० रुपये असून १०० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे सदर अनुदान अत्यंत तोकडे असून बॅगांची उपलब्धता तर खूपच कमी आहे. त्यातच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सातबारा, ८ अ, पासबुक, शासनाची २३ रुपये फी भरावी लागते. तसेच ऑनलाईन सेवा केंद्रावर शंभर रुपये घेतले जातात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे किमान १२० ते १५० रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे सदर योजनेमुळे शासनालाच महसूल प्राप्त झाल्याचा दिसून येत आहे.
गावस्तरावर होणार बियाणांचे वाटप...
लॉटरी पद्धतीने बियाणे वाटप करण्यासाठी संगणकीय प्रणालीत १ हजार ८७७ शेतकऱ्यांपैकी ५४३ जणांची लॉटरी लागली आहे. निवड झालेल्यांना सोयाबीन व तुरीचे बियाणे वाटप होणार आहे. बियाणांची उपलब्ध करण्यात आली असून, लॉटरीत नाव आलेल्या शेतकऱ्यांच्या गावातील कृषी सहायकाकडून त्यासंबंधीचे परमिट उपलब्ध करून घ्यावे, बियाणे घेऊन जावे, असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी भुजंग पवार यांनी केले आहे.
सर्व बियाण्यांवर अनुदान द्या...
महाबीज बियाणे २ हजार ते २२०० रुपयाला आहे. बाजारात इतर सोयाबीन बियाणे ३३०० ते ३४०० रुपये प्रति ३० किलोप्रमाणे आहे. त्यामुळे शासनाने सर्वच बियाण्यांवर १ हजार ते १२०० रुपये अनुदान देऊन कमीत कमी पैशांमध्ये बियाणे उपलब्ध करून द्यावेत. असे शेतकरी शिवकुमार उटगे म्हणाले.
शासनाचा महसूल वाढवणारी योजना...
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शासनाकडे २३ रुपयांचा भरणा केला जातो. १ हजार ८७७ शेतकऱ्यांनी जवळपास ४३ हजार रुपयांचा शासनाकडे महसूल भरणा केला आहे. त्यातही मोजक्याच शेतकऱ्यांची निवड झाली आहे. या योजनेमुळे शासनाचा महसूल वाढला आहे. त्यामुळे सर्वांनाच मोफत बियाणे द्यावे. असे बालाजी बोबडे म्हणाले.