शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील दैठणा येथील लेंडी नदीवर पाईप टाकून बांधण्यात आलेल्या कमी उंचीच्या पुलावरून तासन् तास पाणी वाहत असल्यामुळे शिरूर अनंतपाळ, दैठणा, उदगीर राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प होत असून विविध गावांचा संपर्क तुटत आहे.
तालुक्यातील घरणी, मांजराच्या पटीत लेंडी नदी सुध्दा मोठी असल्याने लेंडी नदीवर साकोळ मध्यम प्रकल्प बांधण्यात आला आहे. त्यामुळे लेंडी नदीचे पात्र घरणी, मांजराइतकेच रुंद आहे. म्हणून दैठणा येथे लेंडी नदीवर बाॅक्ससेल पध्दतीने उंच आणि रुंद पूल बांधणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने उदगीर-लातूर वाहतूक सध्या उदगीर, दैठणा, शिरूर अनंतपाळ, लातूर या राज्यमार्गाने सुरू आहे.
पावसाळ्यात लेंडी नदीला पूर आला की, सातत्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. राज्यमार्गावरील वाहतूक तासन् तास ठप्प होत आहे. शिरूर अनंतपाळहून उदगीरकडे जाणारी वाहने पलीकडे, तर उदगीरहून शिरूर अनंतपाळ, लातूरकडे जाणारी वाहने अलीकडे अडकून पडत आहेत. त्यामुळे त्याचा रहदारीस मोठा फटका बसत आहे. मंगळवारी जोरदार पाऊस पडल्यामुळे पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे जवळपास दिवसभर वाहतूक ठप्प होती.
शेतकरी, शेतमजूर शेतातच अडकले...
दैठणा येथील अनेक शेतकऱ्यांचा बैलबारदाणा मळ्यातील गोठ्यावर असल्याने शेतकरी, शेतमजूर, सालगडी रात्रीच्या वेळी मळ्यातील गोठ्यावर मुक्कामासाठी जातात. सोमवारी रात्री गोठ्यावर मुक्कामासाठी गेलेल्या अनेकांना मंगळवारी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे शेतातच अडकून पडावे लागले.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता रवींद्र पवार म्हणाले, लेंडी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले आहे.