शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील विविध गावांच्या ओसाड जमिनीवर नंदनवन फुलविण्यासाठी साकोळ मध्यम प्रकल्प वरदान ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे मध्यम प्रकल्प शंभर टक्के कधी भरणार याकडे लागले होते. दरम्यान, संततधार झालेल्या पावसामुळे साकोळ मध्यम प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी ओव्हर फ्लो झाला असून, शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे परिसरातील विविध गावांतील शेतक-यांनी जल्लोषात प्रकल्पातील जलसाठ्याचे पूजन केले.
तालुक्यातील साकोळ मध्यम प्रकल्पामुळे उदगीर, देवणी, शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यातील दैठणा, शेंद, तिपराळ, कानेगाव, साकोळ, तळेगाव, पांढरवाडी, शंभू उंबरगा, करवंदी, वाघनाळवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर्स जमीन सिंचनाखाली आली आहे. अनेक माळरान जमिनीवर नंदनवन फुलले आहे. त्यामुळे साकोळ परिसरात ग्रीनबेल्ट तयार झाला आहे. वर्षानुवर्षे कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकरी बागायतीकडे वळले. यंदा साकोळ मध्यम प्रकल्पाच्या भरोशावर अनेक शेतक-यांनी नवीन ऊसाची लागवड केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे मध्यम प्रकल्प कधी भरणार याकडे लक्ष लागले होते. दोन महिन्यांचा पावसाळा उलटला तरीही साकोळ मध्यम प्रकल्प ५० टक्क्यांच्या आतच होता. दरम्यान, नुकत्याच झालेल्या जोरदार पावसाने साकोळ मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे.
पाणीपातळी ५३३.१७ मीटर...
दोन महिने पावसाळा उलटला तरीही साकोळ मध्यम प्रकल्प ५० टक्क्यांच्या आतच होता. त्यामुळे मध्यम प्रकल्प कधी भरेल याकडे परिसरातील शेतक-यांचे डोळे लागले होते. तीन दिवसापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. प्रकल्पात ५३३.१७ मीटर एवढी पाणीपातळी झाली असल्याचे उपविभागीय अभियंता पी.व्ही. पाटील यांनी सांगितले. त्यामुळे शेतक-यांतून समाधान व्यक्त होत आहे.
शेतक-यांनी केले जलपूजन...
साकोळ मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यावर तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी जवळपास १२५० एकर ऊसाची लागवड केली आहे. दरम्यान, मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांनी जल्लोषात जलपूजन केले. यावेळी पंडित लवटे, बाजार समितीचे सभापती लक्ष्मण बोधले, उपसभापती कल्याणराव बर्गे, प्रकाश पाटील बाकलीकर, जागले, ॲड. सुतेज माने, सुधीर लखनगावे, अमर आवाळे, निवृत्ती सूर्यवंशी, सूर्यकांत बानाटे, रमेश मोहिते, यशराज दुरूगकर, श्रीपती कुंभार, दत्तात्रय भोसले यांची उपस्थिती होती.