खरिपाची पेरणी यावर्षी दोन टप्यामध्ये झाली. पेरणीनंतर काही दिवसांतच पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पिके संकटात सापडली असतानाच अचानक पावसाने सुरूवात केली. यात तालुक्यात अनेक मंडळात अतीवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळावी ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. मात्र त्यात अडचण येत असल्यामुळे सरसकट पंचनामे करा असे आदेश दिले होते. याबाबत विमा कंपनीकडून ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल केली नाही अशा शेतकऱ्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची गरज आहे. सप्टेंबर मध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीन,मुग,उडिद,ज्वारी पिकाचे नुकसान झाल्याचे विमा कंपनीस ऑफलाईन पध्दतीने पूर्वसूचना देण्यासाठी १६ सप्टेंबर शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येथील तालुका कृषी कार्यालयात यात्रेचे स्वरूप आले होते. या कार्यालयाकडे जाणारा रस्ता शेतकऱ्यांच्या गर्दीने बंद झाला होता.दरम्यान, शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने यांनी केली.
पोलिसांनी सोडली गाडीची हवा...
ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांच्या मोटारसायकली रस्त्याच्या बाजूला लावण्यात आल्याने वाहतुकीस मोठा खोळंबा झाला होता. यामुळे पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांच्या गाड्याची हवा सोडल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या गाड्या ओढत आणाव्या लागल्या. तर कोरोणा संसर्गाचा काळ असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले. अर्ज दाखल करण्यासाठी आणखी चार दिवसांची मुदवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी माधव शिंगाडे यांनी केली.