जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे रुग्ण सोलापूरला रवाना...
अवयवदान प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी समिती तातडीने गठीत करून शासनाची संमती मिळविता येते का यावर बरीच धावपळ करण्यात आली, परंतु निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी डॉक्टरांशी चर्चा करून रुग्णाला तत्काळ सोलापूरला हलविण्यासाठी सहकार्य केले. प्रत्येक अर्धा तासाला जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन अवयवदानाचा लाभ इतर रुग्णांना मिळण्यासाठी तत्परता दाखविली. सध्या स्थितीत पवार कुटुंबीय सोलापूरला असून गुरुवारपर्यंत सर्व प्रक्रिया पार पडेल.
नूतनीकरण थांबले, जबाबदार कोण...
अवयवदान प्रक्रिया थांबण्याची ही दुसरी वेळ आहे. साधारणपणे दीड वर्षापूर्वी १७ वर्षीय युवतीच्या कुटुंबीयांनी अशीच इच्छा प्रदर्शित केली, परंतु त्याहीवेळी नूतनीकरण व तत्सम तांत्रिक अडचणीमुळे अवयवदान प्रक्रिया होऊ शकली नाही. परत दुसऱ्यांदा तेच घडले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने जबाबदारी वेळेत पार का पाडली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख हे कार्यालयीन कामकाजासाठी बाहेरगावी आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी नूतनीकरण करून घेण्याचे निर्देश दिले होते. त्याचेही पालन झाले नसल्याने आता घडल्या प्रकाराची चौकशी होणार याकडे लक्ष लागले आहे.
पवार कुटुंबीयांचे कौतुक...
शरद दादासाहेब पवार हे शेतकरी आहेत. त्यांचे बंधू प्रा. सतीश पवार, आशिष पवार यांनी कुटुंबीयांतील सदस्यांशी संवाद साधला. शरद पवार यांच्या पत्नी सुलभा पवार, मुलगी साक्षी, श्रुती यांच्यासह सर्वांनीच अवयवदानाला तत्काळ संमती दर्शविली. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या आई सिंधू पवार यांनीही देहदानाचा संकल्प केला आहे. गरजूंना जीवदान मिळण्यासाठी पवार कुटुंबीयांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.