लातूर : जिल्हा बँक पीक विमा भरून घेण्यात राज्यात अव्वलस्थानी असून, बँकेच्या १११ शाखांमध्ये २ लाख ६१ हजार १६८ शेतकऱ्यांनी २३ कोटी ४२ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला आहे.
शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बँकेने गावस्तरावर सोसायटी, कार्यालयात पीक विमा भरून घेण्याची सोय केली होती. कोविडच्या काळात सलग दुसऱ्यावर्षी बँकेने गावातून पीक विमा भरून राज्यात नवा पॅटर्न निर्माण केला आहे. सुट्टीच्या दिवशीही बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या गावातून पीक विमा स्वीकारला असून, बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे अध्यक्ष ॲड. श्रीपतराव काकडे, उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, कार्यकारी संचालक हणमंत जाधव व संचालक मंडळाच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.
तालुकानिहाय पीक विमा अन् शेतकरी सभासद
लातूर तालुक्यात ३४ हजार २९ शेतकऱ्यांनी ३ कोटी २९ लाख ९२ हजार रुपयांचा पीक विमा भरला आहे. रेणापूर तालुक्यात १४ हजार ७४६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३० लाख ८ हजार रुपये, औसा तालुक्यात ४४ हजार ३४ शेतकऱ्यांनी ३ कोटी ६६ लाख ८९ हजार रुपये, निलंगा तालुक्यात ४४ हजार ७५८ शेतकऱ्यांनी ३ कोटी ५३ लाख ८९ हजार रुपये, चाकूर तालुक्यात ३७ हजार ५९ शेतकऱ्यांनी ३ कोटी १३ लाख ८५ हजार रुपये, अहमदपूर तालुक्यात २१ हजार ११८ शेतकऱ्यांनी २ कोटी ४१ लाख ५६ हजार रुपये, उदगीर तालुक्यात २५ हजार ३०३ शेतकऱ्यांनी २ कोटी ७२ लाख ६० हजार रुपये, देवणी तालुक्यात १३ हजार ८३९ शेतकऱ्यांनी २ कोटी ७२ हजार लाख ६० हजार रुपये, जळकोट १० हजार ५६० शेतकऱ्यांनी ८० लाख ८८ हजार रुपये आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात १५ हजार ६५१ शेतकऱ्यांनी ३१ लाख ८० हजार रुपये असा एकूण २ लाख ६१ हजार १६८ शेतकऱ्यांनी २३ कोटी ४२ लाखांचा पीक विमा भरला आहे.