आ. निलंगेकर म्हणाले, मराठवाड्यातील २५० महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी होऊन २५० लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य मंत्रिमंडळात मराठवाड्यातील पाच-सहा मंत्री असतानादेखील एकही मंत्री नुकसानीच्या पाहणीसाठी घराबाहेर पडल्याचे आढळून आले नाही. शिवाय, मराठवाड्याच्या विकासासाठी ते कधी बोलल्याचे दिसले नाही. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातला शेतकरी अडचणीत असताना सरकार त्यांना वाऱ्यावर सोडून देत आहे. पंचनामे आणि नुकसानीच्या अहवालाची वाट पाहत आहे. वास्तविक पाहता ६५ मिमी पाऊस आणि ३३ टक्क्यांपुढे नुकसान झाल्यास सरसकट मदत करणे अपेक्षित असते; परंतु हे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. अहवालाची वाट न पाहता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार मदत करावी, अशी मागणी त्यांनी पत्रपरिषदेत केली. पत्रपरिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी सभापती संजय दोरवे यांची उपस्थिती होती.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठवाड्याचा विकास खुंटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST