उदगीर व जळकोट तालुक्यांत गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे तालुक्यातील देवर्जन मध्यम प्रकल्प मंगळवारी १०० टक्के पाण्याने भरून ओसंडून वाहू लागला आहे. तीस वर्षांत सहाव्यांदा हा प्रकल्प पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. देव नदीकाठच्या नागरिकांना उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्पात मंगळवार सायंकाळपर्यंत ९५ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती शाखा अभियंता नयूम मोमीन यांनी दिली. तिरु नदीकाठच्या नागरिकांनी पण सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार गोरे यांनी केले आहे.
उदगीर-जळकोट तालुक्यातील गुडसुर, एकुरका, चांदेगाव, पिंपरी, बनशेळकी, चेरा, जंगमवाडी, ढोरसांगवी, डोंगरगांव, केसगरवाडी, सोनवळा हे लघू प्रकल्प यापूर्वीच पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र या पावसामुळे मिटलेला आहे.