पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोगांना प्रतिबंध करण्यासाठी दरवर्षी मनपाच्या वतीने फवारणी मोहीम राबवली जाते. यावर्षीही मागील १५ दिवसांपासून शहरात फवारणी केली जात आहे. यासाठी पालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. फवारणी मोहीम गतिमान करण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ वापरले जात आहे. शहर स्वच्छ राहावे, डासांचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी प्रत्येक प्रभागात धूर फवारणी, नियॉन फवारणी केली जात आहे. ॲबेटिंगही सुरू आहे. प्रत्येक झोननिहाय दररोज विभाग ठरवून कर्मचारी फवारण्या करत आहेत. प्रत्येक घराय फवारणी केली जात आहे. खुल्या प्लॉटमध्येही फवारणी केली जात असून, डासोत्पत्ती होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे. आगामी काही दिवसांत फवारणीची मोहीम पूर्ण होईल. नागरिकांनी फवारणीसाठी आपल्या घरी येणाऱ्या मनपाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. आपले घर व घराचा परिसर फवारणी करून घ्यावा, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
साथरोगांच्या पार्श्वभूमीवर मनपाची फवारणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:24 IST