भाजपचे आंदोलन...
भातीय जनता पक्षाने पथदिवे सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी महानगर पालिकेत आंदोलन केले. मनपा उपायुक्तांना दोन कंदील भेट देऊन याप्रकरणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसांपासून शहर अंधारात आहे. प्रशासनाने यासंदर्भात काहीच पावले उचलली नाहीत, असा आरोप करण्यात आला. आंदोलनात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, ॲड. शैलेश गोजमगुंडे, शैलेश स्वामी यांच्यासह कार्यकर्ते, नगरसेवक सहभागी झाले होते.
वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे गैरसोय...
शहरातील बार्शी रोड, औसा रोड, गंजगोलाई, नांदेड नाका, अंबाजोगाई रोड, रेणापूर नाका, आदी मुख्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या तीन दिवसांपासून बंद आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे शहरवासीयांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तीन दिवस उलटले तरी अद्याप मनपा प्रशासनाकडून पथदिवे सुरू करण्यासंदर्भात हालचाल केली नाही. आयुक्तही बाहेरगावी गेल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यातच शहरात रात्रीच्या वेळी संचारबंदी आहे. संचारबंदीचा अंमल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.