रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनधारकांची गैरसोय
हरंगुळ : शहरानजीक असलेल्या हरंगुळ नवीन वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक दिवसांपासून आहे. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारक त्रस्त आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्याने किरकोळ अपघात होत आहेत. याकडे लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
शाळांच्या वतीने ऑनलाईन अभ्यासक्रम
लातूर : कोराेनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने शाळांच्या वतीने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु आहे. विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरी भागात सुरळीत अभ्यास सुरु असला तरी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अभ्यासात नेटवर्कचा अडथळा येत आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहत आहेत. दरम्यान, माध्यमिकच्या जिल्ह्यातील १०५ शाळा सुरू आहेत. त्याच धर्तीवर ५ ते सातवीचे वर्ग सुरु करण्याची मागणी पालकांमधून केली जात आहे.