अहमदपूर येथील पद्मीनबाई तुळशीराम वाढवणकर (७२) यांना २५ एप्रिल रोजी श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. तसेच सिटीस्कॅन स्कोअर १२ आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर १५ दिवस उपचार केले. विशेष म्हणजे, रेमडेसिविर इंजेक्शन दिले नाही. त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना ९ मे रोजी सुटी देण्यात आली. वेळेवर योग्य उपचार आणि सकारात्मक विचारसरणीमुळे त्यांनी कोरोनावर मात केली आहे.
आजींना बीपी आणि शुगरचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्यावर १५ दिवस उपचार करावे लागले. रेमडेसिविर इंजेक्शन न देता त्यांना औषधोपचार देऊन बरे करण्यात आल्याचे डॉ. पी. एस. कदम यांनी सांगितले.
तत्काळ उपचार घ्यावेत...
कोरोनाची लक्षणे जाणवू लागताच तत्काळ दवाखान्यात जाणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. जीवन जगताना नेहमी सकारात्मक रहावे. त्यामुळे कोणत्याही आजारातून आपण बरे होऊ शकतो. या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे आपण कोरोनावर मात केली, असे पद्मीनबाई वाढवणकर म्हणाल्या.