कोल्हापूर : पदाधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर लगेचच महापुराचे संकट आल्यामुळे जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांना अजूनही कामाला म्हणावी तशी सुरुवात करता आलेली नाही. येत्या आठवड्यात जरा कामाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे.
जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चारही पदाधिकाऱ्यांची १२ आणि १३ जुलै रोजी निवड करण्यात आली. त्यानंतरचा आठवडा कार्यालय प्रवेश, सत्कार समारंभ, भागात सत्कार यांमध्ये गेला. यानंतर स्थायी समितीची सभादेखील झाली. आता कुठे कामकाज सुरू होईल अशी अटकळ असतानाच जिल्ह्यात प्रचंड पावसाने महापूर आला. या दरम्यान अध्यक्ष राहुल पाटील गेल्या आठवड्यात न चुकता जिल्हा परिषदेत दिवसभर थांबत होते. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी हेदेखील आजऱ्याला जाण्यासाठी रस्ता बंद असल्याने तीन दिवस कोल्हापुरातच होते.
सभापती वंदना जाधव, शिवानी भोसले, रसिका पाटील, कोमल मिसाळ यांनाही पुरामुळे येण्यात अडचणी होत्या. तसेच जिल्हा परिषदेतील यंत्रणा देखील महापूर व्यवस्थापनाच्या कामातच अजूनही गर्क आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा, यानंतर आता मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांचे दौरे यामुळे येणाऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदेचे नियमित कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे.