कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या माध्यमातून आनंदराव पाटील-चुयेकर यांनी ग्रामीण भागातील गोरगरिबांचे संसार सुखी व समृध्द केले. प्रतिकूल परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने धवलक्रांती रूजवली व ती यशस्वी केल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
चुये (ता. करवीर) येथे आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, स्थानिक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध ठेवून गावाचे सरपंच पद २५ वर्षे भूषविलेल्या आनंदराव पाटील यांनी गोकुळची उभारणी व विस्तार यशस्वीरित्या केला. तसेच केडीसीसी बँकेचे संचालक पद व उपाध्यक्ष पद, शेतकरी संघाचे दीर्घकाळ संचालक व अध्यक्ष पद व बिद्री कारखान्याच्या संचालक पदासह जिल्हा परिषद सदस्य पदही त्यांनी भूषविले व पदांना सन्मान मिळवून दिला. शेतकरी संघाचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी स्वागत केले. यावेळी माणिक पाटील-चुयेकर, सुयोग वाडकर आदी उपस्थित होते.
जोड नव्हे मुख्य व्यवसायच
दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोड मानला जातो. परंतु कोल्हापूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायच मुख्य झाला असून एवढी व्याप्ती वाढली आहे. दुग्ध व्यवसायामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सुखी व समृद्ध असल्यानेच शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जिल्ह्यात नाही.
फोटो ओळी :
चुये (ता. करवीर) येथे आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या सातव्या पुण्यततिथीनिमित्त ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केले. यावेळी माणिक पाटील-चुयेकर, शशिकांत पाटील-चुयेकर आदी उपस्थित होते. (फोटो-१७०१२०२१-कोल-चुये)