कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई)च्या दर्शनासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंदिर परिसरातील अस्वच्छता, हेरिटेज वास्तूची न घेतलेली काळजी आणि रखडलेला विकास निधी यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. यावेळी पवार यांनी मंदिरासाठी निधी आणणे ही स्थानिक नेत्यांची जबाबदारी असल्याचे सांगितले.दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज, मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर प्रदक्षिणा मारताना त्यांना मंदिराच्या दगडी भिंतीचे टवके उडालेले दिसले. त्यावर संगीता खाडे यांनी संगमरवरी फरशी काढल्याने भिंतीची अशी अवस्था झाल्याचे सांगताच पवार यांनी हेरिटेज वास्तूचे काम करताना काळजी घ्यायला पाहिजे होती, असे कसे काम केले, अशा शब्दांत सुनावले. मंदिराच्या आवारात घालण्यात आलेल्या फरशीवरही त्यांनी कसली पाय भाजणारी फरशी बसवलीय, असेही सुनावले. तसेच भवानी मंडप परिसरातील अस्वच्छतेबद्दल नगरसेवक आदिल फरास यांनाही दम भरला. (प्रतिनिधी)खानविलकर कुटुंब पक्ष सोडणार नाहीत..प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्नी वरदा व मुलगी आदिती यांच्यासमवेत देवीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना तटकरे यांनी कालच काही वर्तमानपत्रातून वाचण्यात आले की, खानविलकर कुटुंबीय पक्ष सोडणार; पण आम्हाला खात्री आहे की, ते राष्ट्रवादी सोडणार नाहीत, असा आशावाद व्यक्त केला.
मंदिराच्या असुविधांवर कार्यकर्त्यांची कानउघडणी
By admin | Updated: September 17, 2014 00:04 IST