कोल्हापूर : वीजबिलांच्या थकबाकीमुळे सध्याचे आर्थिक संकट अभूतपूर्व असले तरी महावितरणसाठी हे आव्हान नवीन नाही. ते दूर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने व एकत्रितपणे प्रयत्न सुरु केले आहेत. येत्या मार्चपर्यंत जास्तीत जास्त थकबाकी वसुलीसाठी वीज ग्राहकांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष किंवा व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे त्यांच्या शंका, संभ्रम व तक्रारी दूर करण्यासाठी तत्पर राहा. यासोबतच महावितरणच्या महसुलाकडे बारकाईने लक्ष ठेवा. मीटर रिडींगमध्ये एजन्सीकडून चुका होत असल्यास त्यांच्याविरुद्ध तत्काळ व कठोर कारवाई करा, अशा सूचना महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केल्या.
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील महावितरणमधील विविध कर्मचारी संघटनांच्या सुमारे ६० वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी नाळे यांनी मंगळवारी नववर्षानिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधला. गतवर्षाचा मागोवा घेत कोरोना संकट, ‘निसर्ग’ चक्रीवादळ तसेच इतर प्रतिकूल परिस्थितीत महावितरणच्या कर्मचारी, अभियंता, अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांचे नाळे यांनी विशेष कौतुक केले.
नाळे म्हणाले, कोरोना कालावधीमधील वीजबिले अचूक असतानाही त्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे थकबाकीमध्ये वाढ होत आहे. परिणामी आर्थिक संकट गडद झाले आहे. अशास्थितीत महावितरणचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आपण स्वीकारले आहे. वीज ग्राहकांना तत्परतेची व आपुलकीची सेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
या संवाद कार्यक्रमात उपमहाव्यवस्थापक (मासं) अभय चौधरी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर (पुणे), श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) व भूपेंद्र वाघमारे (कोल्हापूर) यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले.