हुपरी : ऊसतोडीसाठी अतिरिक्त रक्कम देणार नसल्याचा निर्धार व्यक्त करून रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील शेतकऱ्यांनी ऊसतोडीबाबत होत असलेल्या अडवणुकीची कैफियत निवेदनातून सर्व साखर कारखान्यांसमोर मांडली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल सर्वच कारखान्यांनी घेत, ऊसतोड मजूर व वाहनधारकांना कोणीही ऊसतोडीसाठी आगाऊ पैसे घेऊ नयेत, अन्यथा शेतकऱ्यांची अडवणूक करणारी टोळी व मुकादमांचे काम बंद करण्याचा लेखी आदेश तातडीने बजाविला आहे.
ऊसतोड मजूर, मुकादम अथवा वाहनधारकांकडून अशा प्रकारची अडवणूक होत असल्यास त्यांनी कारखान्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. चालू हंगाम गेल्या वर्षीपेक्षा एक महिना आधीच बंद होणार असून, गाळपाला कमी प्रमाणात ऊस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस वेळेत तुटणार नाही अशी भीती मनातून अगोदर काढून टाकावी. उसाला तोड देणे व त्याचे गाळप करणे ही कारखान्याची जबाबदारी आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी संयम ठेवून ऊस तोडणी कामगार , वाहनचालक यांना खुशाली देणार नाही व देऊ देणार नाही या मताशी ठाम राहावे. कारखाना आपल्या सोबत आहे, असा विश्वास जवाहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला. यावेळी राजू कोल्हापुरे, दत्ता पाटील, किरण वाळके, रामदास पाटील, मोहन खोत, विनायक मेथे, बाळासाहेब शिंदे, आदित्य पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी - रेंदाळ येथील शेतकऱ्यांनी ऊसतोडीबाबत होत असलेल्या अडवणुकीबाबतच्या कैफियतचे निवेदन जवाहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांना दिले. यावेळी मोहन खोत, राजू कोल्हापुरे, दत्ता पाटील, किरण वाळके, रामदास पाटील, विनायक मेथे, बाळासाहेब शिंदे, आदित्य पाटील, आदी उपस्थित होते.