कोल्हापूर: शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, स्त्रिया, विद्यार्थी, युवक यांच्या चळवळींना बळ देणे हे डाव्या संघटनांचे आद्य कर्तव्य आहे. फॅसिस्ट शक्ती वाढत असल्याने त्यांच्या विरोधात लढण्यासाठी जनतेच्या शक्तिशाली चळवळी नेटाने उभ्या करण्याची गरज आहे. त्यासाठी लाल निशाण पक्ष आणि भाकपा (मार्क्स लेनिनवादी) लिबरेशन यांनी एकत्र येऊन येथून काम करतील, अशी घोषणा करण्यात आली आहे.
लाल निशाण पक्ष व भाकपा लिबरेशन यांची एकत्रित बैठक श्रमिक पुणे येथे झाली. यावेळी फॅसिस्टविरोधी शक्तींनी एकत्र येऊन एकेमकांबरोबर घनिष्ठ सहकार्याने काम करण्याचा निर्णय झाला. उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था, प्रचंड प्रमाणातील बेकारीचे अरिष्ट्य, कोलमडलेली शिक्षण व आरोग्य व्यवस्था, बहुमोल सार्वजनिक मालमत्तांचा सरसकट लिलाव, कार्पोरेट लूक यावर आवाज उठवण्यासाठी डाव्या संघटनांनी एकत्र असणे गरजेचे असल्यानेच एकत्र आल्याचे जाहीर करण्यात आले. २७ सप्टेंबरच्या भारत बंदमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासह लोकांनीही सहभागी होण्यासाठी प्रचार करण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात आला.
बैठकीत कोल्हापुरातून अतुल दिघे, भाकपचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य, लाल निशाण पक्षाचे सरचिटणीस भीमराव बनसोड, अध्यक्ष सुभाष वाकुस्ते, प्रशांत कुमार, कविता कृष्णन, उदय भट, विजय कुलकर्णी, राजेंद्र बावके, मेधा थत्ते, विकास अळवणी, जीवन सरुडे, श्याम गोहिल, अजित पाटील यांनी सहभाग घेतला.