दिलीप चरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवे पारगाव : हातकणंगले तालुक्यातील सर्वांत जास्त चर्चित ठरलेल्या वाठार तर्फ वडगाव ग्रामपंचायतीमध्ये निकालानंतर देखील सत्तेचे त्रांगडे होऊन बसले आहे. काठावर बहुमत असलेल्या आघाडीकडे अनुसूचित जातीचा उमेदवार नाही. दोन उमेदवार विरोधी आघाडीकडे तर एक वाठार विकास आघाडीकडे असल्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करताना या उमेदवारांवर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे तीन उमेदवारांपैकी कोणाला लॉटरी लागणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
वाठार तर्फ वडगाव येथील निवडणूक अटीतटीची झाली. प्रत्येक आघाडीने आपापल्या प्रभाव क्षेत्रात चांगले यश मिळवले. यात जय हनुमान आघाडीला ८ जागा मिळाल्या, तर संत गोरोबाकाका आघाडीला ६ जागांवर समाधान मानावे लागले. वाठार विकास आघाडीला फक्त १ जागा टिकवता आली. सरपंचपदाचे आरक्षण पडल्यानंतर मात्र सर्वाधिक जागा जिंकलेल्या जय हनुमान आघाडीला निराश व्हावे लागले. कारण, त्यांच्या आठ जागांमध्ये एकही अनुसूचित जाती (एस.सी.)चा उमेदवार नसल्यामुळे त्यांना इतरांसोबत हातमिळवणी करण्याची वेळ आली आहे. विरोधात असलेल्या संत गोरोबाकाका आघाडीकडे सागर कांबळे व नाजुका भुजंगे हे दोन उमेदवार अनुसूचित जाती (एस.सी.) संवर्गातील आहेत. वाठार विकास आघाडीच्या एकमेव विजयी उमेदवार माजी उपसरपंच तेजस्विनी वाठारकर या देखील अनुसूचित जाती (एस.सी.) संवर्गातील असून, त्यांची जय हनुमान आघाडीसोबत जाण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करावयाची झाल्यास विरोधी गटातील उमेदवाराच्या गळ्यात सरपंचपदाचा हार घालावा लागणार आहे. फक्त कोणत्या उमेदवारासाठी गटनेते तडजोड करतात आणि उपसरपंचपदावर कोणकोण समाधान मानणार, यावरच सरपंचपदाचा मानकरी कोण ठरणार, हे अवलंबून आहे.