कोल्हापूर : पौराणिक परंपरा असलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाचा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रथम ब्रिटिशांनी आणि नंतर राज्यकर्त्यांनी विकास केला. आज तोच विकास पन्हाळकरांच्या मुळावर उठला आहे. ३६१ वर्षांपूर्वीच्या पावसाळ्यात पाहिलेला वेढा आजही पन्हाळकर वेगळ्या स्वरूपात अनुभवत आहेत. त्यावेळी सिद्दी जौहरचा, तर आज निसर्गाचा वेढा पन्हाळ्याभोवती पडला आहे.
पन्हाळ्यावर येणारा एकमेव वाहतुकीचा रस्ता २३ जुलै रोजी खचला आणि पन्हाळ्यावरील नागरिकांचीही सक्तीने नजरकैद झाली. सिद्दी जौहरचा वेढा २ मार्च १६६० रोजी पडला, तो शिवाजी महाराजांनी १२ जुलै १६६० रोजी तोडला; परंतु गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पन्हाळ्यावर पर्यटक न आल्याने, तत्पूर्वी २०१९ मध्ये पन्हाळगडाला जोडणारा रस्ता खचल्यामुळे या निसर्गाच्या वेढ्यात अडकलेल्या रहिवाशांची सुटका कोण करणार? मधल्या पाच महिन्यांचा कालावधी सोडला तर गेली तीन वर्षे पन्हाळकर या वेढ्यात अडकून पडलेले आहेत. पर्यटकांवर अवलंबून असलेला येथील रहिवासी पुन्हा उपासमारीच्या विळख्यात सापडला आहे.
पन्हाळ्याच्या चारी बाजूंनी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भूस्खलन होते आहे. पन्हाळगडावर येण्यासाठी जे तीन प्रमुख मार्ग आहेत, त्यांतील आज जो रस्ता खचला, तो ऐतिहासिक चार दरवाजा ब्रिटिशांनीच १८१८ मध्ये पाडला. तीन दरवाजा येथून मोठा उतार असल्यामुळे तेथील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता; परंतु आता आणीबाणी म्हणून मिनी व्हॅनच्या माध्यमातून तेथून वाहतूक सुरू केली आहे.
तिसरा मार्ग हा ऐतिहासिक वाघ दरवाजा येथून जातो; परंतु तबक उद्यानामुळे तेथून केवळ चालतच जाता येते. त्यामुळे खऱ्या अर्थाने पन्हाळावासीय नजरकैदेत आहेत.
सन २०११ च्या गणनेनुसार पन्हाळ्याची लोकसंख्या ३०२१ इतकी आहे. गडावरील तीन दरवाजा, तबक वन उद्यान, अंबरखाना, याशिवाय मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील छोटे हॉटेल व्यावसायिक, झुणका-भाकरी विकून गुजराण करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना नातेवाइकांकडून पैसे आणून जगावे लागले. पर्यटकांवर अवलंबून असणारे छोटे भेळचिरमुऱ्यांचे गाडे, आइस्क्रीम विक्रेते, मिनी ट्रेन चालविणारे, घोड्यावरून पन्हाळादर्शन घडविणारे, रिक्षा व्यावसायिक, पन्हाळ्याचा ऐतिहासिक वारसा शब्दांतून मांडणारे वाटाडे या साऱ्यांची रोजीरोटी बंद पडली आहे.