नेसरी : जनता भाजपच्या भूलभुलैयांना भुलली, सोशल नेटवर्किंगचा वापर करून खोटीनाटी माहिती जनतेला पुरविली. देशात उद्योगधंद्यांच्या बाबतीत महाराष्ट्र पुढे असताना गुजरात राज्य पुढे असल्याचा प्रचार केला. टोल बंद करा, एल.बी.टी. रद्द करा, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा म्हणून आंदोलने करणारे आता कुठं गेले? आमचे सरकार असताना आंदोलने करणारे आता गप्पा का? असा सवाल राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला केला.येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत हाते. अध्यक्षपदी तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील-मुगळीकर होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदाताई बाभूळकर, आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, नेसरीला वेगळं महत्त्व आहे. पक्षात दोघांनी बंडखोरी केली. मोदी लाटेची हवा असतानाही दिवंगत बाबा कुपेकर यांनी केलेल्या विकासकामांमुळे व निवडून येण्याची क्षमता पाहून आम्ही संध्यादेवी कुपेकरांना उमेदवारी दिली. ती जनतेने सार्थ ठरवत त्यांना दुसऱ्यांदा निवडून दिले. विधिमंडळाचा नेता म्हणून मी आभार मानतो. विरोधी पक्षात असलो तरी काम करण्याची हातोटी असल्याने निधी आणण्यात कुठेही कमी पडणार नाही. आज सगळ्या जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असताना धर्मांध शक्ती वाढत आहे.केंद्रामध्ये महाराष्ट्रातील बडे नेते आहेत. त्यांच्याकडे महत्त्वाची खाती आहेत. त्यांनी महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काहीतरी करून दाखवावं, असे आवाहनही पवार यांनी केले.यावेळी रामराजे कुपेकर, डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी संध्यादेवींना कठीण परिस्थितीत साथ देऊन निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. यावेळी आजरा तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, चंदगड तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील, रघुनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.सरपंच वैशाली पाटील यांनी स्वागत केले. जयसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास शोभादेवी शिंदे-नेसरीकर, शिवप्रसाद तेली, सभापती अनुराधा सुतार, अमर चव्हाण, सुजाता पाटील, रामाप्पा करिगार, मुन्नासोा नाईकवडी, कावेरी चौगुले, राजू होलम, विष्णुपंत केसरकर, उपसरपंच दयानंद नाईक, अमर हिडदुगी, आशादेवी तेली, महाबळेश्वर चौगुले, आदींसह आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
आंदोलन करणारे आता गप्प का?
By admin | Updated: January 11, 2015 00:46 IST