कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील तळंदगे येथील पाणी याेजनेच्या अशुद्ध दाबनलिकेच्या कामाला कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. सोमवार, दि. २७ सप्टेंबरला सर्व अधिकारी या ठिकाणी पाहणी करून शेतकऱ्यांची चर्चा करतील. तरीही विरोध कायम राहिला तर कायदेशीर प्रक्रियेने हे काम पूर्ण करू असे लेखी पत्र मिळाल्यामुळे तळंदगे सरपंचांसह सदस्यांनी जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले आमरण उपोषण शुक्रवारीच मागे घेण्यात आले. यावेळी आमदार राजू आवळे उपस्थित होते.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत तळंदगे येथे काही वर्षांपूर्वी पाणी योजना मंजूर झाली. या योजनेचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु, अशुद्ध दाबनलिकेचे काम हे कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील हद्दीत येते. पाणंद परिसरातील या कामाला तेथील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे ही पाणीयोजना पूर्ण झालेली नाही म्हणून सरपंच जयश्री भोजकर, सदस्य जयश्री शिरोळे, रूपाली कांबळे, जयश्री लोखंडे, कृष्णात पवार हे शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणास बसले होते.
यानंतर आमदार आवळे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सोमवारी कसबा सांगावचे सरपंच, कागलचे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह संयुक्त पाहणी करून चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरीही विरोध कायम राहिल्यास कायदेशीरदृष्ट्या काम पूर्ण करून घेतले जाईल असे लेखी पत्र आमदार आवळे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना देण्यात आले. यांनतर आंदोलन मागे घेण्यात आले.
२४०९२०२१ कोल राजूबाबा आवळे
तळंदगे सरपंच, सदस्यांनी पाणी योजनेबाबत शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. आमदार राजू आवळे यांनी लेखी आश्वासनाचे पत्र दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.