उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथे निवडणूक प्रचाराचा धुरळा उठत आहे. त्यात उदगाव पेयजल नळ पाणी योजना कळीचा मुद्दा ठरत आहे. ही योजना कोणी मंजूर करून आणली, यावरून श्रेयवाद सुरू आहे.
महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ कार्यक्रमात समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांनी तत्कालीन मंत्री सदाभाऊ खोत यांना दिलेले पत्र व त्यावर त्यांनी दिलेले आदेश वाचूनच दाखविले. उदगाव ग्रामपंचायतीची १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. स्वाभिमानी विरुद्ध काँग्रेस, यड्रावकर गट व शिवसेना अशी येथे लढत होत आहे. साडेसात कोटी रुपये खर्चाच्या पेयजल योजनेवरून स्वाभिमानी व शिवसेनेत वाक्युद्ध रंगले आहे.
कोट -
तत्कालीन पाणीपुरवठामंत्री सदाभाऊ खोत व उल्हास पाटील यांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा केला होता. मंजुरीचे पत्र मंत्रालय येथे घेऊन योजना चांगल्या पद्धतीने राबवली जावी यासाठी कायम प्रयत्न केले आहेत. विरोधकांनी दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊ नये.
- स्वाती सासणे, समाजकल्याण सभापती
कोट -
आपण सभापती असताना सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली होती. विषय फक्त ४० लिटर की ७० लिटर एवढाच राहिला होता. त्यामुळे जनतेला योजना कोणी आणली याची पूर्ण कल्पना आहे. यापुढेही जनतेसाठी काम करत राहू.
- सावकर मादनाईक, माजी बांधकाम सभापती