संतोष मिठारी = कोल्हापूरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आश्वासन, शिवाजी विद्यापीठाकडून सादर झालेला प्रस्ताव, सामाजिक संघटनांकडून पाठपुराव्यांतील सातत्य असूनदेखील विद्यापीठातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून शासनाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. विद्यापीठाची तयारी असूनदेखील निव्वळ शासनाची उदासीनता अध्यासनाला मारक ठरत आहे. उद्या, शुक्रवारी अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने घेतलेल्या आढाव्यात हे चित्र स्पष्ट झाले आहे.थोर साहित्यिक, समाजचिंतक व कामगार चळवळीचे नेते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याची प्रस्तुतता आजही अधोरेखित करता येते. या महापुरुषाच्या विचारांचा जागर करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र होण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी निवेदन, मोर्चा, आंदोलनाद्वारे विद्यापीठाकडे मागणी केली.त्यानुसार अण्णा भाऊ यांच्या कार्याविषयीची तीव्र सामाजिक भावना विचारात घेऊन विद्यापीठाने त्यांचे अध्यासन व्हावे, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे २७ जुलै २०११ रोजी सादर केला. त्यानंतर विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अध्यासन केंद्राला मान्यता देण्याचे आश्वासन दिले. त्यावर लगेचच या प्रस्तावाला मान्यता मिळेल, अशी अपेक्षा विद्यापीठासह याबाबत लढा देणाऱ्या, पाठपुरावा करणाऱ्या संघटनांना होती. मात्र, त्यावर काहीच झाले नाही. त्यानंतर विद्यापीठाने २ जानेवारी २०१२ रोजी पुन्हा या प्रस्तावासह स्मरणपत्र पाठविले. सामाजिक संघटनांनी मंत्र्यांना निवेदने दिली, तरीही अध्यासनाबाबत शासनाकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. विद्यापीठाने मान्यतेचा प्रस्ताव सादर करून तीन वर्षे उलटली, तरी शासनाचे त्याकडे दुर्लक्षच आहे. लालफितीतील शासनाचा हा कारभार थोर साहित्यिक, समाजचिंतक अण्णा भाऊ यांची आणि त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी लढा देणाऱ्यांची परवड करणारा आहे.
‘अण्णा भाऊ साठे अध्यासन’ प्रतीक्षेत
By admin | Updated: July 18, 2014 00:56 IST