वाघराळी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत निवडणूक चर्चेची बनली आहे. सात जागांसाठी निवडणूक होत आहे. तालुका संघाचे माजी अध्यक्ष बी. एम. पाटील-वाघराळीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
श्री रवळनाथ ग्रामविकास पॅनेल, श्री भावेश्वरी ग्रामविकास पॅनेल या स्थानिक दोन आघाड्यांसह राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असे तीन पॅनेल व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवारही रिंगणात आहेत.
यावेळची निवडणूक राजकीय पक्षांना फाटा देत स्थानिक राजकारणी मंडळी आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुका लढवत आहेत.
७ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे ३ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात १४३९ मतदार आहेत.
सत्ताधारी सत्ताधारी श्री भावेश्वरी ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच जयवंत पाटील, मनोहर पाटील, बंडोपंत पाटील तर श्री रवळनाथ ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व बी. एम. पाटील-वाघराळीकर, कृष्णा सावंत, गणपत पाटील करत आहेत.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेतृत्व संदीप कुराडे, भरमू नाईक, संदीप रेडेकर करत असून, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता अनिल कोकितकर या निवडणुकीत नशीब अजमावत आहेत. त्यांना रमेश डोंगरे, संतोष पाटील, परसू कुराडे आदींची साथ आहे.
दमदार स्थानिक नेत्यांच्या दोन आघाड्यांत मोठी चुरस असली तरी तरुणांचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पॅनल व स्वाभिमानीचा एकमेव उमेदवार अशी सरमिसळ रंगतदार निवडणूक पाहायला मिळत आहे.
स्थानिक गट व भावकीचे राजकारण निवडणुकीत कलाटणी देणार की काय, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.