पेठवडगाव : येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची डागडुजी न करता आरक्षित जागेवर पुतळा स्थलांतरित करावा. तसेच पुतळ्याभोवतीचे अवैध व्यवसाय बंद करावेत. मटण व मच्छी मार्केट स्थलांतर करावेत आदी मागण्यांसाठी बौद्ध समाजाच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. तसेच नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी येत्या पंधरा दिवसांत पुतळा स्थलांतराचा निर्णय विशेष सभा घेऊन घेऊ, असे प्रशासनाने सांगितले.
शुक्रवारी रात्री ट्रक अपघातामुळे संरक्षण कठडा धक्का बसून ढासळला. याबाबत बौद्ध समाजाच्या वतीने नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज, शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास बौद्ध समाजाच्या वतीने घोषणा देत पालिकेवर मोर्चा काढण्यात आला आणि नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पुतळ्याच्या संरक्षण कठड्यास ४ वेळा अपघात होऊन त्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे लोकांच्या भावनेचा आदर करून पुतळ्याची डागडुजी न करता पुतळा पालिकेमध्ये स्थलांतरित करावा. नवीन प्रस्तावित आरक्षित जागेत पूर्णाकृती पुतळा उभा करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवतीचे अवैध धंदे बंद करण्यात यावेत. येथील मटण, चिकन, मच्छी मार्केट का स्थलांतरित केले नाही, याचा लेखी खुलासा करावा. अन्यथा बौद्ध समाज, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
याबाबत नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व जिल्हा परिषदेची जागा हस्तांतरित होण्याबाबतचा ठराव पालिका सभेत करू, असे लेखी आश्वासन दिले.
यावेळी शंकर कराडे, मिलिंद सनदी, अश्वजित पोवार, मारुती धनवडे, सदाशिव पोवार, प्रमोद धनवडे, किशोर पोवार, शिवरुद्र पोवार, अनिकेत कांबळे, सागर कांबळे, गणेश मोरे, सागर आयरेकर, नंदू मोरे आदी उपस्थित होते. फोटो कॅप्शन २५ वडगाव निवेदन
पेठवडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी शंकर कराडे, मिलिंद सनदी, अश्वजित पोवार, मारुती धनवडे, सदाशिव पोवार आदी उपस्थित होते.