आजरा :
आजरा तहसीलदार यांनी लग्नासाठी दिलेल्या परवानगीचे व अटी, शर्तींचे उल्लंघन केल्याने तसेच विनापरवाना वरात काढल्यामुळे शेळप (ता. आजरा) येथील नवरा-नवरी, दोघांचे वडील व बेंजोचालक या पाच जणांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस पाटील शांताराम पांडुरंग पाटील यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, रविवार (२५) एप्रिल रोजी वैभव निवृत्ती पाटील व माधुरी शशिकांत नवार यांचा विवाह झाला. रात्री या दोघांची ११.३० वाजेपर्यंत वरात काढण्यात आली. लग्नासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार २५ लोकांच्या उपस्थितीत परवानगी दिली होती. पण लग्नात दोन्ही गटाकडून ९० ते १०० लोक उपस्थित होते. लग्नास दोन तासांची परवानगी असतानाही त्यांनी वेळेचे उल्लंघन केले आहे.
लग्नाच्या वरातीस परवानगी नसतानाही १०० ते १२० लोक उपस्थित राहून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. पोलिसांनी वैभव निवृत्ती पाटील, माधुरी शशीकांत नवार या नवदांपत्यासह त्यांचे वडील निवृत्ती तातोबा पाटील, शशीकांत कृष्णा नवार व बेंजोचालक विजय अशोक कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पो. हे. कॉ. दत्ता शिंदे तपास करीत आहेत.